Thursday, April 22, 2021

जाऊ तिथे खाऊ

एसटीने निरुद्देश भटकंती करत खादाड हा प्रकार मी गेल्या दिड एक वर्षात सुरु झाला. पण त्याशिवाय कामानिमित्त फिरतानादेखील त्या त्या शहरात, गावात, शहराच्या एखाद्या विशिष्ट भागात काहीतरी वेगळे शोधून खाल्ल्याशिवाय मला चैनच पडत नाही. आपोआपच काही ना काही सापडत जाते. मग कधी कुठेतरी कोणीतरी लिहलेले आठवते, तर कधी एखाद्या मित्राशी बोलून नवीन ठिकाण, नवा खाद्यपदार्थ गवसतो. 
कामानिमित्त किंवा असंच कुठंही गेले की मला आपोआपच त्या भागात काय खायला मिळते याचा वास येऊ लागतो. मग ते एखादं प्रसिद्ध ठिकाण असो की शहर असो की आडवाटेचे गाव. कामाबरोरच खादाडी काय करता येईल याची योजना डोक्यात साकारत असते... 
गोरेगाव स्टेशनला उतरलो की मला जिकडे जायचं आहे त्या ठिकाणच्या बस, रिक्षेच्याआधी तिकडचा फेमस जिलेबीचा गाडा दिसतो. डोंबिवलीला उतरलो की अप्पम कुठ कुठं मिळते ती ठिकाणं आधी आठवतात, मग बाकीचं. मालाड पश्चिमेला असलेली मिठाई, नमकीन, चाट मिळणारी भली मोठी दुकानं आठवतात. मशिद, काळबादेवीला खिचा पापड, फराळी पॅटीस असं समोर येते. कुरुंदवाड, सांंगली, कोल्हापूरातून मिसळ न खाता मी बाहेरच पडत नाही. मध्ये एकदा ग्रॅन्टरोडला एका स्टोरीसाठी गेलो तेव्हा पश्चिमेला एक अस्सल गोमंतंक हॉटेल दिसले, जेवायची वेळ होतीच, मग पोटभर गोमंतकीय पदार्थांचा आस्वाद घेतला. लालबागला जयंत भेळपुरी अशी एक ना दोन, ही यादी न संपणारी आहे. यातील काही ठिकाणं ही ठरवून खायला जावं अशी असतात, पण तसे दरवेळी जमेलच असे नाही. मग कामाच्या निमित्ताने ही संधी चालूनच येते.
पर्टनस्थळी तर हाताशी वेळ असतोच, तेव्हा तेथे तर अगदी ठरवून शोध घेतला जातो. 
यातूनच कधी कधी काही अगदी ठरुनच जाते. मुंबई/ठाण्यातून कोणताही घाट चढून देशावर पोहचलो की, 'मटणच खायचंं' असे मला आता डॉक्टरांनीच सांगितलं आहे. त्यामुळे पुणे, नाशिक या ठिकाणी केवळ नाश्त्यापुरताच शाकाहार असतो. नाशिक, पुणे, कुरुंदवाड, सांगली, मिरज येथील अनेक खानावळी धुंडाळून झाल्या आहेत.  
असो,
तर त्यातूनच बरंच काही जमा होत गेलं. पूर्वी स्मार्ट फोन नव्हता. त्यामुळे छायाचित्रांचा तसा दुष्काळच, पण खादाडी मात्र जोरात असायची. रमजान मधील एखादी खाद्य भटकंती डिएसएलआर घेऊन झाली पण तो एकच काय तो प्रयोग. आता स्मार्टफोन आल्यावर नव्याने काही जुन्या ठिकाणांना मुद्दाम भेट दिली जाते. त्यातून खंडीभर छायाचित्रे जमा झाली आहेत. फेसबुकवर पण बरंच लिहून ठेवलंय.
त्यातूनच जसे जमेल तसे काही प्रमाणात का होईना संकलन करावे असे ठरवलंय. बघू कसे जमते ते. मध्यंतरी अंधेरी पूर्वेला एकेठिकाणी एकदम ऑफबीट साबुदाणा खिचडी खाल्ली. 'साँवरीया खिचडी'. त्यावेळच्या पोस्टवर अमित सामंत या माझ्या पक्क्या खव्वय्या मित्राने यावर 'जाऊ तेथे खाऊ' अशी टिप्पणी केली. त्यामुळे ब्लॉगला हेच नाव दिलंय.
या पोस्टसाठी कोणत्याही एका पदार्थाचा फोटो न टाकता, मु्द्दामच रिकामी प्लेट ठेवली. आहे. कारण जेथे जाऊ तेथे त्या त्या ठिकाणी जे जे उत्तम असेल ते खायचे हाच आपला फंडा आहे. तर येत्या काही दिवसात या ब्लॉगद्वारे या प्लेटमध्ये नवनवीन पदार्थ ट्राय करुया.. 

हॅप्पी खादाडी
सुहास जोशी
+91 9833068140